भाजपचे राज्यातील दिग्गज नेते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : ९ मार्च – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने काढलेला मोर्चा आझाद मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेट्रो सिनेमाजवळ अवडण्याता आलं आहे. शेकडोच्या संख्येने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवलं आणि त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, मोर्चेकऱ्यांनी विधानभवनावर धडकण्याचा अट्टाहास धरल्यानंतर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचं आव्हान केलं आहे. मात्र, मोर्चेकरी अजूनही घटनास्थळी अजूनही आंदोलन करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाच्या परिसरात बॅरिकेड्स लावून मोर्चेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर पोलिसांना सहकार्य करा, त्यांच्याशी हुज्जत घालू नका, असं आवाहन फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना केलं आहे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप यांनी आज मोर्च्याची हाक दिली होती. त्यामुळे राज्यभरातून भाजपचे हजारो कार्यकर्ते आझाद मैदानात आले होते. यावेळी झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी संबोधित केलं. फडणवीस यांचं भाषण झाल्यानंतर आझाद मैदानातून हा मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला. मात्र, मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा येताच पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवलं. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चेकऱ्यांना अडवण्यात आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली.
मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस जिथे अडवतील तिथे पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन केलं होतं. त्यानुसार पोलिसांनी मेट्रो सिनेमा परिसरात मोर्चा अडवताच पोलिसांनी फडणवीसांना ताब्यात घेतलं. फडणवीस यांनीही अटक करून घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि नितेश राणे आदी नेत्यांनीही अटक करवून घेतली. त्यानंतर पोलिसांची व्हॅन त्यांना घेऊन गेली.
पोलिसांची व्हॅन गेल्यानंतरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. पोलिसांनी या सर्वांना घरी निघून जाण्याचं आवाहन वारंवार मेगाफोनवरून केलं. त्यानंतर काही काळ घोषणाबाजी केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते पांगले.
मोर्चा सुरु होण्यापूर्वी फडणवीसांनी तडाखेबंद भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बॉम्बस्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार करून जमीन घेणाऱ्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही काही आमची राजकीय मागणी नाही. राजकारणासाठी आम्ही बोलत नाही. रोज घटना घडतात. आम्ही रोज राजीनामा मागत नाही. ही घटना बघितली तर राज्याला लाज आणणारी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply