मुलाला वाचवायला गेलेल्या वडिलांचाही बंधाऱ्यात बुडून मृत्यू

अकोला : ७ मार्च – अकोल्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा बंधाऱ्यात बुडाल्याची माहिती मिळताच वडिलांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला वाचविण्यासाठी बंधाऱ्यात उडी घेतली. मात्र, मुलासोबत वडिलांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथे काल सायंकाळी उघडकीस आलीअकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या उकळी बाजार येथे वाण धरणातील कॅनॉलचे पाणी ओव्हर फ्लो होत असल्याने या पाण्यावर बंधारा बांधण्यात आला आहे. सद्यस्थित धरणातून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी सोडले जात आहे. बंधाऱ्यात पाणी असल्याने परिसरातील शेतकरी याठिकाणी गुरेढोरे धुण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेत असतात. काल सायंकाळी उकळी बाजार येथील रहिवासी १४ वर्षीय कन्हैया गजानन शर्मा हा मुलगा कपडे काढून बैलजोडी धुण्यासाठी बंधाऱ्यात उतरला. परंतु पाण्याची पातळी न समजल्यान तो बुडाला.
ही बाब शेजारी बकऱ्या चारणाऱ्या मुकबधीर मुलाला दिसली. त्याने कन्हैयाच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. कन्हैयाचे वडील गजानन मोहनलाल शर्मा (वय ४८ वर्ष) यांनी घटनास्थळ गाठून बंधाऱ्यात उडी घेतली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. काळाने वडील व मुलगा दोघांवर झडप घातली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या संदर्भात माहिती मिळताच गावकरी मंडळी, पोलीस पाटील व तलाठी तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, मृतक गजानन शर्मा यांच्याकडे तीन एकर शेती आहे. तसेच ते ठोक्यानेसुद्धा इतरांची शेती करतात, त्यामुळे शेती कामात खूप पैसा खर्च होत असल्याने त्यांनी काही महिन्यापूर्वी बैल जोडी खरेदी केली होती.

गजानन शर्मा यांच्या पत्नीचे किडनीच्या आजाराने निधन झाले. आता त्यांचा व मुलाचाही मृत्यू झाला. त्यांची १२ वर्षीय मुलगी ईश्वरी पोरकी झाली आहे. वडील, भावाचे छत्र हरविल्यामुळे मुलीवर संकट कोसळले आहे.

Leave a Reply