राणे पितापुत्रांची नऊ तास चौकशी, चौकशीनंतर नारायण राणेंचे खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : ६ मार्च – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज मालडच्या मालवणी पोलीस ठाण्यात सलग नऊ तास चौकशी करण्यात आली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत जे खळबळजनक आरोप केले आहेत त्या आरोपांवरुन तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली आहे. त्याच प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात सलग नऊ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर राणे पोलीस ठाण्याच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिशा सालियान केस प्रकरणात आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं थेट नाव घेतलं आहे.
“माझ्या स्टेटमेंटमध्ये मी सगळी माहिती सुरुवातीपासून जे घडलं ते सांगितलं. एवढंच नाही, सुशांत आणि दिशाची हत्या झाल्यानंतर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोनवेळा फोन आला. सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एक मंत्र्यांची गाडी होती असं बोलू नका. मी बोललो असं का बोलायचं नाही? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. नाही, तुम्हालाही मुले आहेत. तुम्ही असं काही करु नका. पण माझं हे वाक्य माझ्या स्टेटमेंटमधून वगळलेलं आहे. मी अनेकदा हे वाक्य टाकायला सांगितलं. पण त्यांनी हे वाक्य वगळलं आहे. याचाच अर्थ आजची केस राजकीय हेतून प्रेरित होऊन मुद्दामून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही”, असं नारायण राणे म्हणाले.
“मला दोन दिवसापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यामधून एक नोटीस आली होती. कलम 41 (अ)ची नोटीस आली होती. आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्याला यावं असं म्हटलं होतं. दिशा सालियनच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगण्यासाठी बोलावलेलं आहे. दिशा सालियनबद्दल आम्ही जे काही पत्रकार परिषदेत बोललो होतो की, खरे आरोपी पकडले पाहिजे. तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आमची दिशा सालियनसाठी न्याय मिळवण्याची मागणी असताना तिची आई म्हणते बदनामी होते, अशी खोटी तक्रार पोलीस ठाण्याला दिली. पोलीस ठाण्याने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. आम्ही 9 तास पोलीस ठाण्यात होतो”, असं नारायण राणे यांनी सांगितलं.
“आम्ही वारंवार सांगतोय, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहेत. आम्हाला अधिकार आहे, कुणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवण्यासाठी लढण्याचा आम्हाला अधिकार आहे. दिशा सालियनवर अन्याय झाला. तिला न्याय मिळवण्याची आमची मागणी असताना आमच्यावर केस दाखल करण्यात आली. आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे. आम्ही या प्रकरणात शेवटपर्यंत जाणार. शेवटी मी अमित शाहांना फोन केला. त्यानंतर शेवट आमची स्टेटमेटं पुरी झाल्यानंतर सोडलेलं आहे”, असं राणे म्हणाले.
“कुणावरही अन्याय होणार असेल तर अन्यायाविरोधात आवाज उठवणारच. आमच्या आयुष्यातील पाच ते दहा तास घेतले म्हणजे फार काही मिळवले असे होत नाही. आम्ही दिशा सालियन आणि सुशांतच्या हत्येबद्दल जिथे संधी मिळेल तिथे न्यायासाठी बोलू. दिशाची केस बंद करण्यात येत आहे. ज्या लोकांनी अत्याचार केला त्याला सरकार संरक्षण देतंय”, असा आरोप त्यांनी केला.
‘शरद पवारांवर टीका’
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, नारायण राणेंनाही अटक झाली होती. त्यांचा राजीनामा का घेतला नव्हता? वा पवारसाहेब! आपल्या या वाक्यावर काय बोलावं किंवा किव करावी हे कळत नाही. अहो, आमचा कुणी दाऊद दोस्त नाही. आमचा कधी संबंध आला नाही. तो देशद्रोही आहे. आमचे हजारो लोकं त्याने बॉम्ब स्फोटात मारले आहेत. त्या दाऊदशी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा संबंध आहे. म्हणून त्यांना अटक झाली. त्यामुळेच आम्ही राजीनाम्याची मागणी करतोय. तुम्ही आमचे राजीनामा मागताय, मागा ना, तुम्ही आयुष्यभर हेच तर केलं”, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.

Leave a Reply