जे मोठमोठ्या गप्पा करतात, ते सगळे तुरुंगात जाणार आहेत – संजय राऊत

मुंबई : २ मार्च – गेल्या आठवड्यात राज्यात किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत असा वाकयुद्धाचा सामना रंगताना पाहायला मिळाला. आधी किरीट सोमय्यांनी शिवसेनेला लक्ष्य करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर संजय राऊतांनी देखील थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर आज आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीनं क्लीनचिट दिल्यानंतर संजय राऊतांनी भाजपावर आणि किरीट सोमय्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
“पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. हळूहळू सगळ्यांना समजेल. ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे बाप-बेटे दारोदार या कोर्टातून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. त्याची गरज तुम्हाला का पडतेय? यातच सगळं स्पष्ट होतंय. मी जे साडेतीन म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा”, असं संजय राऊत म्हणाले.
“त्या साडेतीन लोकांची नावं जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तसतसं तुम्हाला समजेल. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठमोठ्या गप्पा करतात, ते सगळे तुरुंगात जाणार आहेत”, असं राऊत म्हणाले.
आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर त्यावरून देखील संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. “आर्यन खान प्रकरणात एसआयटीनं सांगितलं की त्या मुलाकडे ड्रग्ज सापडलंच नाही. असा बनाव आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत केला जातोय. हे उघड होईल. आता मी समोर आलोय. आत्तापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी सगळ्यांचे मुखवटे उतरवून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा”, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यावरून संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “भारत सरकार सक्षम आहे, पण सरकार चालवणारे भाजपाचे नेते निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यांना उशिरा जाग आल्यामुळे आमच्या मुलांना अपमानित व्हावं लागत आहे. पोलंड, युक्रेन, रोमेनियाच्या सीमेवर लाथाबुक्क्यांनी मारलं जातंय. त्यांना उपाशी ठेवलं जातंय. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आणि तुम्ही राजकारण करत आहात. हे आम्ही करतोय वगैरे. हे तुमचं कर्तव्यच आहे. मनमोहन सिंग यांनीही कुवैत युद्धाच्या वेळी १६ हजार भारतीयांची सुटका केली होती. त्यात गाजावाजा केला नव्हता”, असं राऊत म्हणाले.

Leave a Reply