राज्यात भारनियमनाचा निर्णय घेण्याची गरज पडू शकते – ऊर्जामंत्र्यांनी दिले संकेत

अकोला : १ मार्च – ‘राज्यात कोळशाचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळं दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे त्यामुळं विजेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळं भारनियमनचा निर्णय घेण्याची गरज पडू शकते,’ असा इशारा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना नामदार डॉ. राऊत पुढे म्हणाले, करोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरण कडून राज्यातील जनतेला अखण्डित वीज पुरवठा करण्यात आला. कोरोना मुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची आम्हाला कल्पना आहे. पण जर वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावेच लागतील. वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे, आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
तसंच, ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अश्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही मुर्वत दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यभरात शेतकऱ्यांचे वीज बिल खंडित करण्यावरून तीव्र आंदोलने सुरू असताना ऊर्जामंत्री यांचे वक्तव्य हे आंदोलन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आंदोलक व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष विधमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply