भाजपने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना संपासाठी फूस लावली – नाना पटोले

नागपूर : २३ फेब्रुवारी – भाजपने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना संपासाठी फूस लावली आणि आता त्यांची साथ सोडली. त्यामुळे हे आंदोलन भरकटले असून ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपुरात केली. पटोले म्हणाले,एसटी कामगारांनी त्यांच्या प्रश्नावर लढा दिला. भाजपने त्यांना आंदोलनासाठी प्रेरित केले आणि आंदोलन ऐन भरात असताना त्यांची साथ सोडली. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची अवस्था वाईट आहे. भाजपला केवळ राज्य सरकारविरोधात रोष निर्माण करायचा होता. त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे नव्हते, हे यातून स्पष्ट झाले आहे. पण, आमची भूमिका आहे की, यावर सकारात्मक तोडगा काढला गेला पाहिजे. तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आहे, असेही पटोले म्हणाले.
देशात परिवर्तन हवे असेल तर काँग्रेस महत्त्वाचा घटक आहे.त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत आहोत, अशी भूमिका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मांडली आहे. राव यांची काल भेट होऊ शकली नाही. मी स्वत: त्यांची भेट घेणार असल्याचे पटोलेंनी सांगितले.

Leave a Reply