एका महिलेचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर तीन जणांनी अनुदान मिळण्यासाठी केला पती असल्याचा दावा

बीड : १८ फेब्रुवारी – मागील जवळपास दोन वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली आहेत. घरातील कर्त्या व्यक्तीचं निधन झाल्यानं अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा निराधार कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडून 50 हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान दिला जात आहे. यासाठी राज्यभरातून अर्ज मागवले जात आहे.
पण सरकारकडून मिळणारं हे अनुदान लुबाडण्यासाठी अनेकजण विविध क्लुप्त्या लढवताना दिसत आहेत. आपल्या नातेवाईकाचं कोरोनामुळे निधन न झालेल्यांनी देखील हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज केल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं आहे. असं असताना बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका महिलेचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर तीन जणांनी 50 हजारांसाठी आपण मृत महिलेचा पती असल्याचा दावा ठोकला आहे.
एकाच महिलेचा पती म्हणून तीन जणांनी केलेले अर्ज पाहून प्रशासनाला देखील धक्का बसला आहे. नावातील फरक आणि नाते जुळत नसल्याच्या कारणामुळे प्रशासनाने हे अर्ज नाकारले आहेत. पण 50 हजार रुपये मिळवण्यासाठी तिघांनी केलेला कांड पाहून प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे कागदपत्रांची कसून छननी सुरू आहेत. सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केल्यानंतरच अर्ज स्वीकारले जात आहेत.
आतापर्यंत बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 2 हजार 968 जणांचा मृत्यू झाला आहे. अशात शासनाने मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. हे अनुदान मिळणवण्यासाठी आतापर्यंत 3 हजार 326 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील 2 हजार 117 अर्ज बरोबर असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. संबंधितांना अनुदान मंजूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.

Leave a Reply