मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा, हा राष्ट्रवाद ‘फोडा आणि राज्य करा’ – मनमोहन सिंग

नवी दिल्ली : १७ फेब्रुवारी – देशातील ५ राज्यांच्या रणधुमाळीत आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एन्ट्री घेत धमाका केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील अबोहर येथील सभेपूर्वी मनमोहन सिंग यांनी व्हिडिओद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा आहे. हा राष्ट्रवाद ‘फोडा आणि राज्य करा’ च्या धोरणावर चालतो, असा गंभीर आरोप माजी पंतप्रधानांनी केला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनीही चीनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या पवित्र भूमीवर ठाण मांडून बसले आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास नाही. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. सरकार केवळ देशातच नाही तर परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही अपयशी ठरले आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. देशाची स्थिती चिंताजनक आहे. करोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. दुसरीकडे ७ वर्षे सरकार चालवूनही केंद्र सरकार चुका मान्य करत नाही. लोकांच्या समस्यांसाठी ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत, असे माजी पंतप्रधान बोलले.

पंतप्रधान पदाला विशेष महत्त्व आहे, असे माझे मत आहे. इतिहासाला दोष देऊन तुमचे पाप कमी होऊ शकत नाही. पंतप्रधान म्हणून काम करताना मी जास्त बोलण्याऐवजी कामाला प्राधान्य दिले. आम्ही राजकीय फायद्यासाठी देशाचे विभाजन केले नाही. सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असा टोला त्यांनी लगावला. चिनी सैन्य एक वर्षापासून आपल्या पवित्र धरतीवर ठाण मांडून आहे. पण हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे जुने मित्र तुटले आहेत. शेजारी देशांशीही आपले संबंध बिघडत आहेत. बळजबरीने गळा भेट घेणे, फिरणे किंवा निमंत्रण न देता बिर्याणी खाणे याने देशाचे संबंध सुधारू शकत नाहीत, हे सत्तेत असलेल्यांना हे समजले असेल, आशी आशा आहे. चेहरा बदलून आपली स्थिती बदलत नाही, हेही सरकारने समजून घेतले पाहिजे. सत्य नेहमी बाहेर येते, असेही ते बोलले.
काही दिवसांपूर्वी पंजाबच्या सुरक्षेच्या नावाखाली पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि तेथील लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जे कोणत्याही प्रकारे योग्य मानले जाऊ शकत नाही. बदनामी शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाब आणि पंजाबींची बदनामी करण्याचे प्रयत्नही झाले. पंजाबीच्या शौर्य, पराक्रम देशभक्तीला आणि बलिदानाला साऱ्या जगाने सलाम केला आहे. त्यांच्याबाबत काहीही केले नाही. पंजाबच्या मातीत जन्मलेला एक सच्चा देशवासी या नात्याने याचे खूप दु:ख आहे, असे ते बोलले.
सरकारकडे कुठलीही आर्थिक समज नाही. चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलांना त्रास होत आहे. देशातील अन्नदातेच धान्यासाठी धडपडत आहेत. देशात सामाजिक विषमता वाढली आहे. लोकांवरील कर्ज वाढत असून उत्पन्न कमी होत आहे. अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब अधिक गरीब होत आहे. सरकार आकडेवारीशी फसवणूक करून सर्वकाही बरोबर सांगत आहे. सरकारच्या धोरणात आणि हेतूंमध्ये दोष आहे, असा हल्लाबोल माजी पंतप्रधानांनी केला.

Leave a Reply