त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही – अतुल भातखळकर यांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : १६ फेब्रुवारी – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज, नील सोमय्या अशा भाजपाच्या अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. यासंदर्भात भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया येत असताना आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना खोचक शब्दांत एक विनंती केली आहे.
अतुल भातखळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला तपास यंत्रणांकडून छळलं जात असल्याचा दावा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर अतुल भातखळकरांनी प्रतिहल्ला केला आहे.
“संजय राऊत म्हणजे काय महाराष्ट्र आहे का? मुंबई महानगर पालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणुकीतही संजय राऊत कधी निवडून आले नाहीत. आमच्यासोबत युती केल्याशिवाय यांना कधी १०० जागा मिळाल्या नाहीत. संजय राऊतांना वाटतं की त्यांचं भांडुपचं घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे. गैरसमजात राहू नका. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाहीत. राऊतांनी एक महानगर पालिकेची निवडणूक तरी लढवावी. आयुष्यभर तुम्ही राज्यसभेत गेला आहात. राऊत-उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही”, असं अतुल भातखळकर म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी त्यांना आलेल्या धमक्यांविषयी तक्रार का नाही केली? असा सवाल भातखळकरांनी केला आहे. “राज्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आहे. जर धमक्या दिल्या, तर खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली पाहिजे आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे. पण हे काही करत नाहीयेत कारण त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही”, असं ते म्हणाले.
“माझी राऊतांना विनंती आहे की एकदा तरी म्हणा ना की माझी चौकशी करा”, असं देखील आव्हान भातखळकरांनी दिलं आहे. “राज्याचे पोलीस बहुतेक या मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाहीयेत. गृहमंत्री तर अस्तित्वातही नाहीयेत”, असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.

Leave a Reply