ज्यांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचे स्पेलिंग सांगता येणार नाही त्यांनी या उपक्रमाविषयी बोलू नये -उदयनराजे भोसले

सातारा : १६ फेब्रुवारी – शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भोसले या दोघांमधलं शीतयुद्ध सगळा महाराष्ट्र पाहतो आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं, खोचक टीका करणं हे सातत्याने सुरू असतं. साताऱ्यातल्या विकासकामांबद्दलची टीकाटिप्पणी, श्रेयवाद अशा छोट्या-छोट्या लढाया सतत सुरूच असतात. निवडणुका जवळ आल्या की खासदार उदयनराजेंना इनोव्हेटिव्ह साताऱ्याचं स्वप्न पडतं. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचं कुरण झाली असून नुसतं तिथं चरायचं आणि आपले खिसे भरायचे एवढंच सुरु आहे अशी टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्याला आता उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजे म्हणतात, सातारा शहराच्या व शहरवासीयांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सुरु केलेली इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना, समाजाची आणि समाजहित साध्य करुन घेण्याची चिरकाल चालणारी योजना आहे. ज्या लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगता येणार नाही त्यांनी आमच्या इनोव्हेटीव्ह सातारा या उपक्रमाविषयी काही बोलू नये. लोकांच्या गतीमान सोयी , सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केला आहे.
शिवेंद्रराजेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देत उदयनराजे पुढे म्हणतात, स्वार्थार्थ भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सहकाराचा गळा घोटून स्वाहाकार करुन आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहिलेला आहे. स्वार्थ नसेल तर त्यांचा कोणताही उपक्रम होत नाही, अश्या व्यक्तींना निस्वार्थीपणे नागरिकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची वाढती लोकप्रियता सहन होणारी नाही म्हणून त्यांची नेहमीच कुरकूर असते.
“उदयनराजे हे नेहमीच समाजासाठी जगणारी व्यक्ती म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कुणी कितीही उलट्या बोंबा मारत असले तरी त्या बोंबा मारणा-यांना समाजाने पुरते ओळखले आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा ठोकणा-यांनी, चालवता आल्या नाहीत म्हणून दोन सहकारी बँकांचं विलिनीकरण केलं. तरीही उजळ माथ्याने हिंडणाऱ्यांचा सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरिकांनी पाहिला आहे. त्यांचे पोटात एक आणि ओठात एक या वैशिष्ट्यांचा अनेकांना बसलेला झटका लोक विसरलेले नाहीत. म्हणून बेछुट, बेताल आरोप करुन, त्यांचा सुरु असलेला चारित्र्य हननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आम्ही त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमतही देत नाही. संबंधितांना तरीही आरोप करायचे असतील तर ते त्यांनी पुराव्यानिशी आणि चार-चौघात चर्चेला सामोरे जावून, सिध्द करुन दाखवावेत असे आमचे आव्हान आहे. खऱ्याला मरण नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार आहे”, असंही उदयनराजेंनी पुढे म्हटलं आहे.

Leave a Reply