भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू , जनतेने लुटले ट्रकमधील द्राक्षे

वर्धा : १४ फेब्रुवारी – अपघात घडल्यानंतर अनेक जण मदतीला धावून येत असतात. पण,काही महाभाग यातही संधी समजून लुटमार करत असल्याचे दुर्दैवी चित्र वर्ध्यात पाहण्यास मिळाले आहे. दोन ट्रकच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रकमधील द्राक्षाचा सडा रस्त्याच्या कडेला पडला होता. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी द्राक्षाची अक्षरश: लूट लावली होती.
जिल्ह्यातील केळापूर जवळ हा अपघात झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव येथून १३ कि.मी अंतरावर असलेल्या केळापूर जवळ १२ रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला. रवी भास्कर जाधव (२६) (राहणार मेहेकर, बुलढाणा) असे मृतकाचे नाव असून क्लिनर प्रकाश सुखदेव लष्कर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मृत रवी भास्कर जाधव हा एम.एच.२८ बी.बी. ०९३३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये द्राक्ष भरुन नागपूरकडे भरधाव जात होता. दरम्यान समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असतानाच नागपूरकडून पुलगावकडे जाणाऱ्या यू.पी. ६० ए.टी. ५०८० क्रमांकाच्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात रवी भास्कर जाधव याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश लष्कर हा गंभीर जखमी झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकचा समोरील भाग पूर्णत: चक्काचूर झाला होता. रात्रीच्या काळोखात अपघात झाल्याने काही वेळापर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. तसंच ज्या ट्रकला धडक दिली. त्या ट्रकमधील चालक अमोल घुगरे आणि क्लिनर शेख गफ्फार शेख रहीम यांना किरकोळ मार लागला असून त्यांच्या ट्रकचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुलगाव पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंगी येथील रुग्णालयात पाठवला.

Leave a Reply