भंडाऱ्यात ३१ वर्षीय युवकाची गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या

भंडारा : १४ फेब्रुवारी – भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील नेरला येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. एका ३१ वर्षीय व्यक्तीने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक व्यक्तीने आत्महत्या का केली? यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतक व्यक्तीला पत्नीसह तीन वर्षांची लहान मुलगी आहे. मुलगी आणि लहान मुलीची जबाबदारी असताना तरुणाने इतका मोठा टोकाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न गावातील नागरिकांना सतावतोय.
मृतक 31 वर्षीय तरुणाचं नाव पगमेश्वर रामदास पाल असं आहे. तो नेरला येथील ग्रामपंचायतमध्ये मागील काही वर्षांपासून डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. त्यातूनच त्याला मद्यप्राशनाची सवय जडली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. पगमेश्वर नेमकं कोणत्या दु:खात होता ते समजू शकलेलं नाही. पण त्याने आज टोकाचा निर्णय घेतला. त्याने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पगमेश्वरने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्याच्या कुटुंबियांना ही बाब लक्षात येतात त्यांनी धावाधाव केली. पगमेश्वरचा मृतदेह बघून कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. गावकऱ्यांच्या मदतीने पगमेश्वराचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. यावेळी त्याच्या कुटुंबियांचा सुरु असलेल्या आक्रोशामुळे गावकऱ्यांचेदेखील डोळे पाणावले.

Leave a Reply