लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात ९ जणांचा चिरडून मृत्यू

अनंतपूरम : ७ फेब्रुवारी – लग्नासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. लग्न उरकून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, या घटनेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये एका बालकासह सहा महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात जाताना वाटेतच मृत्यू झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील बुडागवी गावाजवळ झाला आहे. याठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने इनोव्हा कारला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाची रुग्णालयात जाताना प्राणज्योत मालवली आहे.
संबंधित सर्वजण उरवाकोंडा येथील रहिवासी असून ते कर्नाटकातील बेल्लारी याठिकाणी लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न उरकल्यानंतर हे कुटुंब आपल्या इनोव्हा कारने परत आपल्या घरी परतत होतं. लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील नऊ जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची ही घटना समोर येताच उरवाकोंडा गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच उरवाकोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Leave a Reply