गरीब घरात लग्न करून दिल्यामुळे विवाहित महिलेने केली आत्महत्या

नागपूर : ३ फेब्रुवारी – आपला होणार पती चांगल्या पगाराची नोकरी करणारा किंवा बिझनेसमन असावा अशी इच्छा सर्वच मुलींची असते. सरकारी नोकरीवर असणारा मुलगा आपल्याला नवरा म्हणून मिळावा अशी अनेक मुलींची इच्छा असते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणाऱ्या मुलाशी अश्विनीचे तिच्या आई-वडिलांनी लग्न करून दिले. पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत असं काही घडलं की त्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला. नववधूने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
२९ डिसेंबर २०२१ ला अश्विनी आणि हरिदास यांचे लग्न मोठ्या थाटात झाले. लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा करण्यात आला. मुलीकडील सर्व उच्च शिक्षित आणि नोकरीवर होते. हरिदास हा यवतमाळ जिल्ह्यातील येथील असून गरीब घरातील मुलगा आहे. त्याला २०२० मध्ये शिक्षक म्हणून सरकारी नोकरी लागली. तीन वर्षापर्यंत तो शिक्षण सेवक असल्यामुळे त्याला ६ हजार मानधन मिळत आहे. लग्न झाल्यानंतर तो ७ जानेवारीला भाड्याने राहायला आले.
पती-पत्नी आणि मुलीची आजी जलालखेडा येथे भाड्याच्या घरात राहू लागले. पती रोज वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत जायचा आणि नववधू गृहिणी असल्यामुळे ती दिवसभर घरी राहत होती. महिलेची आजी तिच्यासोबत राहत होती. परंतु रविवारी आजी परत गावी केली असता मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास अश्विनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली याचा उलघडा झाला नव्हता. पण नंतर तिने लिहिलेली डायरी हाती लागली.
उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, ठाणेदार हरिश्चंद्र गावडे आणि पोलीस कर्मचारी यांनी बारीकीने घटनास्थळाची पाहणी केली असतात पोलिसांना त्या महिलेने लिहलेली डायरी सापडली. त्या डायरीत जे लिहले होते ते वाचून पोलिसांना धक्काच बसला.
आत्महत्या करणाऱ्या महिलेने त्यात असे लिहले होते की, ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले तो माझ्या जीवनातील काळ दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून देण्यात आले. माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यापेक्षा गरीब असून त्यांचे लग्न चांगल्या श्रीमंत घरी आणि उच्चशिक्षित मुलाशी करण्यात आले. परंतु माझा सर्व परिवार उच्चशिक्षित असून माझे लग्न अशा गरीब घरात करण्यात आले.
या सर्व गोष्टीमुळे तिला नैराश्य आले होते. सोबत आजी राहत असल्यामुळे ती असे टोकाचे पाऊल उचलू शकली नाही. परंतु आजी गावी जातातच तिने असे टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हरिश्चंद्र गावडे आणि त्यांचे सहकारी दिनेश हिवसे, रणजित रोकडे, सातांगे करीत आहे.

Leave a Reply