राज्यातील सत्ता बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सत्ता बरखास्त करा – नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटील यांना टोला

मुंबई : २३ जानेवारी – पहाटे सत्ता गेल्यामुळे भाजप पाण्याती माशासारखा तडपत आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सत्ता बरखास्त करा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याच्या मागणीवर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी मोदी नावाच्या गावगुंडाबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अडचणीत आलाय. त्यावर भाजप का बोलत नाही? गुंडाची चर्चा त्या प्रवृत्तीचे लोक करतात. त्यावर मी बोलणार नाही. समोरचा व्यक्ती सांगतोय मग हे गुंड आहे का?, असं सांगतानाच गुंडाला प्रेमाची भाषा कळत नाही. त्यामुळे गुंडाला मारणार असं मी म्हणालो. याचा अर्थ जीवे मारणार असा होत नाही. मूळ विषयाला बगल देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मी ज्या गावगुंडाबाबत बोललो होतो. तो सर्वांसमोर आला आहे. आता या विषयावर मी बोलणार नाही, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.
लोक भाजपला हसतात. ज्याची बायको पळते, त्याच नाव मोदी ठेवलं जातं. बाकी काही राहिलं नाही आता. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांची लोकं आहोत. आमच्या मनात असे विचार येत नाही. त्यांच्याच मनात विचार येतात, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी वीज प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. आज ऊर्जा खात्याची परिस्थिती सर्वांसमोर आहे. हे खातं मागच्या सरकामुळे अंधारात गेलं. थकबाकी वसुल केली नाही तर हे खातं अंधारात जाईल. भाजप हा डबल गेम खेळत आहे. चालू बिल भरण्यास सांगितले होते. त्याला सुद्धा भाजपा विरोध करत आहे. त्यांचं भाजप राजकारण करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला. अनपढ लोकांवर काय बोलायचं?, मी बावनकुळेंना ओळखत नाही, असा टोलाही त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना लगावला.
या देशाची ओळख पुसण्याच काम केंद्रसरकार करत आहे. रिझर्व्ह बँकेचा फंड गायब करून टाकला आहे. देशाची रिझर्व्ह बँक लुटली गेली आहे. मोठी लूट होत आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply