गंगेत वाहून गेलेले मृतदेह त्यांना मते देणार आहेत का? – संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

मुंबई : १७ जानेवारी – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपावर निशाणा साधला. जिवंत माणसं त्यांना मतदान करणार नाहीत. मग करोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह त्यांना मतदान करणार आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. .
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “करोना काळात गंगेत जे मृतदेह वाहून गेले ते येऊन त्यांना मत देणार आहेत का? जिवंत माणसं तर त्यांना मतदान करणार नाहीत. कधीच नाही करणार. अखिलेश यादव यांनी देखील आपले संपूर्ण लक्ष निवडणुकीवर केंद्रीत केले पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन लढाई लढली पाहिजे. अहंकार सर्वांनाच बुडवतो, हे आपल्या समोर उदाहरण आहे. लोक फार मोठ्या अपेक्षेने अखिलेश यांच्याकडे पाहत आहेत. आम्ही देखील निवडणूक लढवत आहोत, आम्ही निवडणूक लढवू परंतु परिवर्तनाची ताकद जी आहे ती काँग्रेस, अखिलेश आणि जे कोणी भाजपाविरोधातील पक्ष असतील त्यांना मिळूनच लढावे लागेल.”
तसेच, “मोदींनी कुंभ स्नान केलं आणि नंतर दलितांना सोबत घेऊन त्यांचे पाय धुतले होते. आता भाजपाची लोक दलितांच्या घरोघरी जात आहेत. मात्र तुमच्या मनातून जात कधी जाणार? माणूस आहे त्याची जात नसते, असं मी मानतो. परंतु तुम्ही दलितास दलित तर मुस्लीमास मुस्लीम बनवतात. दलित म्हणून त्यांच्या घरी जेवण करतात. तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन जेवत आहात, तुम्ही एखादी जात किंवा व्यक्तीच्या घरात जाऊन नाही जेवण करत आहात हे संपूर्ण ढोंग आहे, राजकारण आहे. मतपेटीचं राजकारण तुम्ही करू इच्छित आहात. असं करू नका देश पुन्हा एकदा जातीप्रथेवरून विभाजित होईल.” असंही यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

Leave a Reply