यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये – सामनामधून टीका

मुंबई : २ जानेवारी – गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बुलेटप्रूफ गाडीची आणि तिच्या किंमतीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहे. नुकताच पंतप्रधानांच्या ताफ्यात एका नव्या गाडीचा समावेश करण्यात आला आहे. ही बुलेटप्रूफ गाडी असून संपूर्णपणे जर्मन बनावटीची ही कार आहे. मात्र, यावरून विरोधकांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या रोखठोक या सदरात नव्या वर्षानिमित्ताने देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. यामध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपावर टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील या कारच्या निमित्ताने निशाणा साधला आहे.
“मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात, म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा करोना वाहून गेला नाही. तो काम आहे. २०२१ अनेक जळमटं तशीच ठेवून सरलं आहे. २०२० मावळताना २०२१ वर्षाला गोंधळ आणि अराजकाची भेट दिली. २०२१ने २०२२ ला तोच नजराणा पुढे दिला”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या सदरात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी घेतलेल्या कारवरून खोचक टोला लगावला आहे. “२८ डिसेंबर रोजी पंतप्रधानाांसाठी विकत घेतलेल्या १२ कोटींच्या नव्या मर्सिडीज कारची छायाचित्र माध्यमांनी छापली. स्वत: फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांच्या सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये”, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
मोदींवर निशाणा साधताना राऊतांनी नेहरू, म. गांधी, इंदिरा गांधी यांची उदाहरणं दिली आहेत. “पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वात जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. पंतप्रधान मोदींची १२ कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे”, असं राऊतांनी यात नमूद केलं आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी आपल्या लेखात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना टोला लगावला आहे. “मोदींचा चेहरा, अमित शाहांची दबंग चाणक्यनीती सर्वत्र चालतेच असं नाही हे पश्चिम बंगालने सिद्ध केलं आहे. कोलकाता महानगर पालिकेतही भाजपाचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपाची २० टक्के मतं कमी झाली. चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपाचा टक्का घसरला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात नव्या वर्षात विधानसभा निवडणुका आहेत. तिथेही भाजपाची घसरगुंडीच होईल, असं स्पष्ट दिसतंय”, असं राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

Leave a Reply