एकनाथ शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात याचा मला विश्वास – रावसाहेब दानवे

जालना : २ जानेवारी – ‘शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, मी आग लावलेली नाही. एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते आहेत मनातली ईच्छा ते बोलले नाहीत. शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात याचा मला विश्वास,’ असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नांदेड-हडपसर-पूणे एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील पहिल्याच किसान रेल्वेचाही शुभारंभ करत ३५० टन कांदा आसाममध्ये रवाना झाला आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तसंच, शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेत मी आग लावत नसून त्यांच्यात आग लावण्याचं काम माझं नाही. रावसाहेब दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करू नये असं जरी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असलं तरी मनातली ईच्छा ते बोललेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते असून पुन्हा मुख्यमंत्री आजारी पडल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे,’ असं दानवे यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यात नांदेड-हडपसर-पुणे एक्स्प्रेसचा आणि जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. या किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्याचा ३५० टन कांदा यावेळी आसाममध्ये पाठवण्यात आला. कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे. त्यामुळे किसान रेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय.
दरम्यान, १ हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच दुहेरीकरण करणार असून या दुहेरी मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती देखील दानवे यांनी दिलीय. तर दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड मार्गाचे दुहेरीकरण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. जालना-खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्वे करण्याचं काम सुरू आहे. असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. तर मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सर्व्हेक्षणाच काम सुरू असून औरंगाबादमध्ये कार्यालयाचं काम सुरू करण्यात आलं असून आवश्यक जागा अधिग्रहण करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल, असंही दानवे यांनी सांगितलं.

Leave a Reply