काका-काकुनीच केला चिमुकल्या मानवीचा खून

यवतमाळ : २८ डिसेंबर – यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कुर्हा डुमनी येथील चिमुकली मानवी चोले अपहरण प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी मानवीचा खून करून तिचा मृतदेह घरातील गव्हाचा कोठडीत लपवून ठेवला होता. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली. मानवी अविनाश चोले, असे मृत चिमुलीचे नाव आहे. दीपाली उर्फ पुष्प गोपाल चोले, गोपाल चोले, अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. आरोपी हे मानवीचे चुलत काका-काकू आहेत.
२० डिसेंबर रोजी दुपारी घरासमोर खेळत असताना मानवी अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणी वडिल अविनाश चोले २९, याने आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. सदर घटनेमुळे आर्णी परिसरात दहशतीचे वातावरण तयार होवून विविध अफवांना पेव फुटले होते. पोलिस विभागापुढे हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान उभे ठाकले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी विशेष गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस ठाणे स्तरावरील एक विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक व सायबर सेल, असे चार पथक त्वरीत गठीत केले. पोलिसांनी आर्णी परिसरात सतत कॅम्प करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. मदतीला वनविभागाच्या पथकालाही घेण्यात आले. तांत्रिक बाबीचे संकलन करून तपास करण्यात आला. अनेक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली.
घाबरलेल्या आरोपींनी स्वत:च्या बचावासाठी अपहृत मानवीचा मृतदेह गावातीलच एका घराच्या मागील बाजूस फेकून दिला. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तातडीने घटनास्थळी पुन्हा दाखल झाले. त्वरित श्वान पथक, न्यायवैज्ञानिक पथक तसेच वैद्यकीय पथकास पाचारण करण्यात आले. या सर्व पथकास हाताशी घेऊन अनोळखी आरोपींविरोधात शोध मोहीम राबविण्यात आली होती. श्वान पथकाने मोलाचे कार्य करीत थेट आरोपी दीपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हिच्या स्वयंपाक घरातील मुख्य घटनास्थळी पोहचविले. त्यावरून दीपाली उर्फ पुष्पा व तिचा पती गोपाल चोले यांना ताब्यात घेवून विचारपूस केली. गुन्ह्याच्या दिवशी अपहरण केले. त्याच दिवशी तिला ठार केले व मृतदेह स्वयंपाक घरातील गव्हाच्या छोट्या कोठीत लपवून ठेवला, अशी कबुली त्यांनी दिली.
गावात सतत पोलिसांचा वावर असल्याने आरोपीस मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी मिळाली नाही. मुख्य आरोपीसह अजून कोणी आरोपी या घटनेत सहभागी आहे का, याचाही तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात चारही पथकाने केली. सदर गुन्ह्याचा आव्हानात्मक तपास अत्यंत व्यावसायिकतेने व कौशल्यपूर्णरितीने करून गुन्हा उघडकीस आणला. त्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी पथकातील अधिकारी व अमलदार यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक सीएन, जीएसटी असे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले. यातूनच ही घटना पुढे आली. कुटुंबातील कलह की गुप्तधनासाठी नरबळी या दिशेने पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Leave a Reply