राज्यपालांच्या अधिकारांमध्ये करण्यात आलेले बदल संविधानातील तरतुदींशी सुसंगत वाटत नाही – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २६ डिसेंबर – राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमांत बदल केले आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपनं आक्षेप घेतला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. तसंच, अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपाल घेतील, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘राज्यपालांचे अधिकार आणि अध्यक्षपदाची निवडणूक याबाबात काही निर्णय घ्यायचे ते राज्यपाल घेतील. पण आम्ही यासंदर्भात निश्चितपणे आक्षेप घेतला होता. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात राज्यपालांच्या अधिकारांमध्ये जे बदल करण्यात आले आहेत, ते संविधानातील तरतुदींशी सुसंगत वाटत नाही. अशाप्रकारे राज्यपालांचे अधिकार कमी करणं, त्याऐवजी मंत्रिमंडळाचा सहभाग वाढवणं हे योग्य नाही, त्यामुळं आम्ही त्याचा विरोध करु,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनादरम्यान काही आमदारांना करोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. त्यावर सरकार अधिवेशन अटोपत घेणार का? असा प्रश्न फडणवीसांना विचारला असता. ‘अधिवेशन पाच दिवसांचं आहे. त्यातले तीन दिवस गेलेत आणि दोन दिवस उरलेत. त्यामुळं अधिवेशन गुंडाळून किती गुंडाळणार,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसंच, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटालाही व्हॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचंही फडणवीस यांनी स्वागत केलं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो की त्यांनी कालच्या सुशासन दिवशी ६० वर्षावरील ज्येष्ठांना बूस्टर डोज देण्याचा निर्णय घेतला. तसेच १५ ते १८ वर्षमधील तरुणांसाठी लसीकरण सुरू करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे ओमिक्रॉनविरोधात लढण्यास बळ मिळेल,’ असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Leave a Reply