आता फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची होणार चौकशी

मुंबई : २४ डिसेंबर – फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत सापडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तर आता याच प्रकरणी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही मुंबई सायबर सेलने चौकशीसाठी प्रश्नावली पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्ध देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिली.
हिवाळी अधिवेशनामध्ये एकीकडे भाजपने महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जोर लावला आहे. तर दुसरीकडे आता फोन टॅप प्रकरणी हालचालींना वेग आला आहे. रश्मी शुक्ला यांनी कोर्टात धाव घेतली होती, या प्रकरणी फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘रश्मी शुक्ला प्रकरणामध्ये मला सायबर सेलने अद्याप साक्षीसाठी बोलवलेले नाही. मला सायबर सेलने एक प्रश्नावली पाठवली आहे त्यानंतर एक पत्र पाठवले. मी कोर्टातले प्रकरण संपल्यानंतर त्यावर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
तसंच, मी विरोधी पक्षनेता असल्याने मी भ्रष्टाचाराचे प्रकरण का बाहेर काढले, हे मला कोणीही विचारू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. तसंच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला. शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला.

Leave a Reply