राज्यात आसमानी संकट कोसळले तरी मुख्यमंत्री ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानात गुंग – रावसाहेब दानवे

औरंगाबाद : २० डिसेंबर – राज्यात आसमानी संकट कोसळलं. अनेक दिवस अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. अशा स्थितीत तत्काळ मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानात गुंग होते. हे त्रिमुखी सरकार राज्यातील बारा कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून वसुलीच्या मागे लागले आहेत, अशी खोचक टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.
यापुढे भाषणात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी माझ्यासमोर बसून सांगावे की, सोयगावचा विकास शिवसेनेने केला की भाजपने केला. सोयगावच्या विकासासाठी भाजपने कायम आग्रही भूमिका घेतली आहे. विकास भाजप करतो आणि नारळ मात्र राज्यमंत्री सत्तार फोडतात. त्यामुळे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम इथे सर्रासपणे सुरु असल्याची टीका त्यांनी राज्यसरकारवरही केली.
भाजपच्या टीकांना उत्तर देताना राज्यमंत्री सत्तार म्हणाले, निवडणूक आली म्हणून भाजप नेते आता सोयगावात दिसू लागले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात ही मंडळी होती तरी कुठे, केवळ उद्योगधार्जिणे धोरण आखून सर्वसामान्यांना महागाईचे चटके देण्याचे काम भाजप करू लागले आहे.
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. आता मंगळवारी 13 जागांसाठी येथे मतदान होईल. प्रचार थांबल्यानंतर उमेदवार गाठी-भेटींवर भर देत आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी तसेच भाजप आणि प्रहार संघटनेनं यंदा जोरदार प्रचार केला. रिंगणातील 40 उमेदवारांनी व त्यांच्या प्रचार प्रमुखांनी 13 प्रभाग पिंजून काढले असून आता शहरवासियांचा कौल काय, हे मतदानाअंती 19 जानेवारीला स्पष्ट होईल.

Leave a Reply