धर्मपरिवर्तनानंतर वसिम रिझवीचे शीर धडावेगळं कारण्याऱ्याला काँग्रेस नेत्यांनी जाहीर केले बक्षीस

नवी दिल्ली : ९ डिसेंबर – शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी ६ डिसेंबर रोजी हिंदू धर्मात प्रवेश केला. यासोबतच त्यांनी आपलं नाव बदलून जितेंद्र नारायण सिंह त्यागी केलं. रिझवी यांनी धर्म बदलल्यानंतर दोन काँग्रेस नेत्यांनी रिझवींचं शीर धडावेगळं करणाऱ्याला ५० लाख आणि २५ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. तेलंगणातील काँग्रेस नेते फिरोझ खान आणि राशीद खान यांनी ही घोषणा केली आहे.
इंडिया टुडेशी बोलताना ते म्हणाले, रिझवी यांनी कोणता धर्म स्वीकारला, याबद्दल आम्हाला कोणतीही अडचण नाही कारण ती त्यांची वैयक्तिक निवड आहे. तसेच भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे कोणी कोणताही धर्म स्वीकारू शकतो. मात्र, रिझवी यांनी गेले आठ महिने सतत इस्लामचा अनादर केलाय, त्यामुळे आमचा संयम संपला असून आम्ही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
“रिझवी म्हणजेच जितेंद्र नारायण सिंह त्यागी कोणता धर्म मानतात, याची आम्हाला पर्वा नाही. भारत धर्मनिरपेक्ष आहे, कोणीही कोणत्याही धर्माचे पालन करू शकतो. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. पण त्यांनी आमच्या धर्माचा अनादर करू नये. जर त्यांनी पुन्हा तसे केले तर आम्ही त्याला ठार मारू शकतो,” असे तेलंगणा काँग्रेसचे नेते रशीद खान म्हणाले.
रशीद खान पुढे म्हणाले, “आठ महिन्यांपूर्वी मी सांगितले होते की जो कोणी वसीम रिझवीचे शीर कापेल त्याला मी २५ लाख रुपये बक्षीस देईन. कारण तो सतत आठ महिने पैगंबरांचा अनादर करत होता. चुकून एकदा कोणी अनादर केला तर समजू शकते. पण सतत नाही. जर कोणी हिंदू देवतांबद्दल असे बोलले तर आमचे हिंदू बांधवही अशीच प्रतिक्रिया देतील.”
“उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते कोणत्या पक्षाचे एजंट झाले आहेत का?, असा सवाल खान यांनी केला. तसेच ते भारतीय समाजाचे ध्रुवीकरण करत आहे. त्यामुळे मुसलमान गप्प कसा बसेल? मी माझ्या २५ लाख रुपयांच्या बक्षीस घोषणेवर ठाम आहे,” असं राशीद खान म्हणाले.

Leave a Reply