शिवसेना यूपीएत गेली तरी काय फरक पडणार आहे – नारायण राणे

पुणे : ६ डिसेंबर – शिवसेना यूपीएत सामील होण्याची चर्चा सुरू असताना, यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना यूपीएत गेली तरी काय फरक पडणार आहे. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारे 303 खासदार आहेत. यूपीएत जाऊन काय होणार आहे, असे नारायण राणे म्हणाले. शिवसेनेची आयडॉलॉजी हिंदुत्वाची आहे .शिवसेनेने हिंदुत्वाशी गद्दारी करून सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून टाकलं आहे, अशी टीकाही राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
भाजपच्यावतीने पदाधिकारी तसेच बूथ कार्यकर्त्यांची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.
संजय राऊत हे काहीही सांगत असतात. ते देशावर देखील बोलत असतात. मनाला येईल असं काहीही बोलत असतात. दिल्लीत सत्ता येईल का? महापालिकेत १० नगरसेवक आहेत. फुगवून-फुगवून किती फुगवेल मग फुगत नाही आणि फुटतात त्याला संजय राऊत म्हणतात, असा टोला देखील यावेळी राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
मध्यंतरी सत्ता परिवर्तनबाबत मी विधान केले होते. त्याबाबत जे काही युक्तिवाद आहे ते सांगायचे नसतात. सत्ता पडल्यानंतर सांगू. एक दोन वेळा कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमासाठी बोलावं लागतं. तसेच एखाद्या दिवशी सत्ता खरंच पडेल, असे देखील राणे यावेळी म्हणाले.
राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. त्यावर देखील राणे म्हणाले की, राज्याचे अधिवेशन कमी दिवसाचे घेता यावे म्हणून ते आकडे फुगून दाखवत आहेत. ओमायक्रॉनचे पुणे आणि मुंबईत रुग्ण सापडले आहेत. चाचण्या होऊ द्या, तपासणी होऊ द्या मग बघू, आतापासूनच एवढे निर्बंध घालणे हे योग्य नाही. एकतर दोन वर्षात लोकांची आर्थिक स्थिती फारच विक झाली आहे. त्यात आत्ता भर टाकू नये, असे देखील यावेळी राणे म्हणाले.
आज पुण्यात भाजपच्यावतीने अभियान ठेवण्यात आले आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. भविष्यात महापालिकेच्या आणि अन्य होणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कशा स्वरूपात काम केलं पाहिजे यासाठी हे अभियान आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. महापालिकेत आता ९७ जागा आहेत. पण त्या १०० च्या पुढे कशा पद्धतीने जाता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी काय काय करावे यासाठी कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता यावी यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे, असेही यावेळी राणे म्हणाले.

Leave a Reply