इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का? – आशिष शेलार

मुंबई : १ डिसेंबर – मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक केल्यावर विविध राज्यांना भेटी देण्याच्या उपक्रमअंतर्गत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी मुंबईत दाखल झाल्या. ममता बॅनर्जी यांनी शहरात दाखल होताच ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा देत शिवसेनेशी राजकीय सहकार्याचे मंगळवारी संकेत दिले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ममतादीदींची भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये उद्योजकांना निमंत्रित करण्याकरिता तसेच राजकीय भेटीसाठी ममता बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या. दरम्यान यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी नाराजी जाहीर करत शिवसेनेला सवाल विचारला आहे.
“ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय… पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण महाराष्ट्रातील उद्योगांना, दिदी पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन ही त्या आल्या आहेत का? म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का? इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?,” असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.
“नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली, यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दिदींना देत तर नाहीना? विरोधकांना चिरडणाऱ्या “बंगाली हिंसेचे” धडे तर गिरवले जात नाही ना?,” असंही त्यांनी विचारलं आहे.
महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी!,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली असून सरकार या भेटीतील चर्चा का लपवते? अशी विचारणा केली आहे.

Leave a Reply