वेडाच्या भरात एकाने कुटुंबातील तिघांसह घेतला एकूण ५ जणांचा बळी

आगरतळा : २९ नोव्हेंबर – वेडाच्या भरात एका व्यक्तीने तब्बल ५ जणांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना त्रिपुरामध्ये उघडकीस आली आहे. मृतांमध्ये आरोपीच्या दोन अल्पवयीन मुली, सख्खा मोठा भाऊ, घटनास्थळी बचावासाठी आलेला पोलिस निरीक्षक आणि शेजारील रिक्षा चालक यांचा समावेश आहे. तर आरोपीची पत्नी आणि रिक्षा चालकाचा मुलगा हे गंभीर जखमी झाले असून त्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
एसएसपी राजीव सेनगुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिपुरातील उत्तर रामचंद्रघाट येथील शौरतोली भागात कौटुंबिक कलहाची माहिती खोवाई पोलिसांना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. या माहितीवरुन पोलीस ठाण्याचे अधिकारी सत्यजित मलिक आपल्या साथीदारांसह घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी प्रदीप देबरॉय याने मध्यरात्री हातात कुऱ्हाड घेऊन त्याच्या दोन्ही मुली आणि मोठा भाऊ कमलेश देबरॉय यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यावेळी बचावासाठी मध्ये पडलेल्या पत्नीवरही त्याने हल्ला केला, यामध्ये ती गंभीर जखमी झाली. या हल्ल्यात त्याच्या दोन्ही अल्पवयीन मुली आणि भावाचा जागीच मृत्यू झाला. बायको कशीबशी घराबाहेर पळाली. यासोबतच प्रदीपच्या घरातील इतर सदस्यही शेजाऱ्यांच्या घरात आश्रय घेण्यासाठी धावले. प्रदीपने परिसरातील इतर घरांवरही हल्ला केला. परिसरातील लोक इतके घाबरले होते की कोणीही घराबाहेर पडण्यास तयार नव्हते.
“जेव्हा मी घराबाहेर आलो, तेव्हा पाहिले की प्रदीप पोलिस निरीक्षकावर हल्ला करत होता आणि इतर पोलिस त्याच्यावर लाठ्या मारत होते. हे सर्व पाहून मी खूप घाबरलो आणि जीव वाचवण्यासाठी आत पळत सुटलो. यानंतर प्रदीपने ऑटोचालक कृष्ण दास आणि त्याचा मुलगा कर्णबीर दास यांच्यावरही वार केले.” असं एका शेजाऱ्याने सांगितलं.
या हल्ल्यात ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस निरीक्षक सत्यजित मलिक, प्रदीप यांची पत्नी आणि ऑटोचालकाचा मुलगा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इन्स्पेक्टर सत्यजित आणि मीना यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आगरतळा येथील जीबी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तिथे उपचारादरम्यान इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला. त्याचबरोबर आरोपीच्या पत्नीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

Leave a Reply