जालना : २९ नोव्हेंबर – पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते घोटाळेबाज असून, येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आणखी चार नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. यावेळी बोलताना सोमय्या यांनी म्हटले की, येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील चार नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होणार असून, त्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांचा समावेश आहे.
यावेळी त्यांनी शिवसेना नेते अनिल परब आणि अर्जून खोतकर यांच्यावर देखील टीका केली आहे. अर्जून खोतकर यांचा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. खोतकर यांनी जालना सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप यापूर्वीच सोमय्या यांनी केला होता. खोतकर यांनी मुळे कुटुंबीयांशी मिळून हा भ्रष्टाचार केला. पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण दाबले गेल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. दरम्यान अनधिकृत रिसाॅर्ट प्रकरणी अनिल परब यांना हरित लवादाने जबाब नोंदवण्यास सांगिते असल्याची माहितीही यावेळी सोमय्या यांनी दिली.
शनी मंदीराच्या पुजाऱ्यावर हल्ला झाला, या घटनेचा मी निषेध करतो. आज बाळासाहेब असते तर ते याविरोधात रस्त्यावर उतरले असते. मात्र शिवसेनेने या घटनेचा साधा निषेध देखील केला नाही. आता पूर्वीची शिवसेना राहिली नसल्याची टीका देखील यावेळी सोमय्या यांनी केली आहे.