एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि निर्णय घ्यावा – संजय राऊत

मुंबई : २६ नोव्हेंबर – एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णयानंतर संपकऱ्यांना संप मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संपकऱ्यांना सल्ला दिला आहे.
‘संप संपायला पाहिजे. कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांना भरघोस पगारवाढ दिली आहे. विलिनीकरणाचा विषय न्यायालयात आहे. पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं हित आहे. जे वकील त्यांना भडकवत आहेत ते त्यांचं कुटुंब जगवण्यासाठी येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था काय झाली हे पाहिलं होतं. एसटी कामगारदेखील मराठा बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि निर्णय घ्यावा,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. ‘मी राष्ट्रवादीविषयी सांगू शकत नाही. विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं. देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभवनात काय सुरु आहे हे आपल्याला माहिती आहे. मग संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?’,’ असा सवाल राऊत यांनी केला आहे.
हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते ते महत्त्वाचं आहे. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ असून गेल्या काही वर्षांपासून रोज पायाखाली तुडवला जात असून अवहेलना केली जात आहे. त्यामुळे सरकारने संविधान दिवस पाळण्याचं जे ठरवलं आहे त्यासाठी विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे. आम्हीदेखील सहभागी होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply