इंधनावरील व्हॅट कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा – काँग्रेसची राज्य सरकारला मागणी

मुंबई : २३ नोव्हेंबर – इंधनावरील व्हॅट कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा अशी काँग्रेसची राज्य सरकारला मागणी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातही आता पेट्रोल-डिझेलवरील कर कमी होऊन जनतेला थोडा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसशासित पंजाब आणि राजस्थान या दोन राज्यांतील सरकारकडून इंधनावरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा देण्यात आला आहे. याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारनेही व्हॅट कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने भरमसाठ इंधन दरवाढ करून जनतेचे कंबरडे मोडले. त्यानंतर केवळ पाच ते दहा रुपये कमी करून जनतेला दिलासा देण्याचा केंद्र सरकारकडून आव आणला जातोय असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.
राज्य सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी कोणताही निर्णय घेत नाही. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा काम राज्य सरकार करत असून इंधनाचे दर केंद्र सरकारने कमी केल्यानंतर राज्य सरकार कडून मात्र इंधन दर कमी केले जात नाही अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

Leave a Reply