अमरावतीत पुन्हा जमावबंदीचे आदेश लागू

अमरावती : २२ नोव्हेंबर – अमरावती शहरात पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. आज होणाऱ्या भाजप आणि वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाचा अमरावती जिल्हा प्रशासनाने धसका घेतला आहे. शहरात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त नागरिक बाहेर दिल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
दरम्यान आज शहरातील बाजार पेठ सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हा सुधारित आदेश जारी केला आहे.
काही दिवसांपूर्वी अमरावतीत त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद उमटलेले दिसले. अमरातवीत बंदला हिंसक वळण लागून हिंसाचाराचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करुन जमाबंदीचे आदेश देण्यात आले होते. भाजपान केलेल्या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागलं होतं. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड देखील केली होती. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.
यामुळे आज होणाऱ्या भाजप आणि वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जमाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर शहरातही कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. २२ नोव्हेंबरच्या पहाटेपासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत सोलापूर शहरात जमाव बंदी लागू असेल. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढलेत.
या जमावबंदी दरम्यान सोलापूर शहरात कोणत्याही प्रकारच्या सभा, आंदोलन, उपोषण, निदर्शने घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
सोशल मीडिया तसेच कोणत्याही वृत्तवाहिन्यांवरुन भडकाऊ भाषण देण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढलेत.

Leave a Reply