विदर्भातील व्यापाऱ्यांच्या समस्या देवेंद्र फडणवीसांनीच सोडवायला हव्या होत्या – शरद पवार

नागपूर : १७ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं आहे. विदर्भातील मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या, असं पवार म्हणाले. तर गडकरी हे विकासकामं करताना पक्ष पाहत नाहीत, असं म्हणत पवारांनी गडकरींच्या कार्यशैलीचं कौतुक केलंय. पवार चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवारांनी आज नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या उद्योजकांशी चर्चा या कार्यक्रमात साहिभागी झाले होते. विविध व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांनी समजून घेतल्या.
राज्य चालवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्यातील जनतेनं मला चार वेळा मुख्यमंत्री केलं. राज्य चालवण्याची संधी मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्याकडे पाहावं लागतं. पण मुख्यमंत्री ज्या भागातून आला त्या भागाकडे जास्त कल असतो. विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या, अशा शब्दात पवार यांनी नाव न घेता फडणवीसांवर टीका केलीय. समस्या काय आहे ती पाहून सोडवावी. ना की त्यांचा पक्ष पाहून. पण असे फार कमी नेते उरले आहेत. नितीन गडकरी यांनी विकासाची अनेक कामे केली. विकासकामं करताना गडकरी पक्ष पाहत नाहीत, अशा शब्दात पवारांनी गडकरींचं कौतुक केलंय.
अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये काही समस्या उद्भवली. त्रिपुरात काही घडलं त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणं योग्य नाही. महाराष्ट्रात हिंसेच्या घटना घडवण्यासाठी कायदा हातात घेणं योग्य नाही. महाराष्ट्रातील वातावरण खराब करणं योग्य नाही. त्याचा व्यापारावर मोठा परिणाम होतो. ज्यांची दुकानं फोडली त्यांचा काय दोष? त्रिपुरातील घटनेत व्यापाऱ्यांचा काय दोष? व्यापाऱ्यांचं काम नुकसान होत असेल तर त्याबाबत सरकारनं धोरण आखणं गरजेचं आहे. हिंसक घटनांमध्ये दुकानांचं नुकसान झालं. त्यांच्या मदतीसाठी धोरण आखण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले.

Leave a Reply