कंगनाच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही – नवाब मलिक

मुंबई : १७ नोव्हेंबर – कंगनाच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत. त्यांना कळले पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे. महात्मा गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या कंगना रणौत हिला मोजक्या शब्दात नवाब मलिक यांनी फटकारले आहे.
नियोजन पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे अशा पध्दतीने वारंवार असे लोक बोलत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.
कंगना रणौत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले केले आहे. अहिंसा हे विचार जगाने स्वीकारले आहेत. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवले तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो मात्र तिने बापूंचा अपमान का केला? आणि तिचा बोलविता धनी कोण? आहे हे देशाला माहीत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
ज्या लोकांनी बापूंची हत्या केली तेपण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे, असे स्पष्टपणे नवाब मलिक यांनी सांगितले.

Leave a Reply