एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल – अनिल परब

मुंबई : १२ नोव्हेंबर – आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, असं आवाहन करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधून पुन्हा एकदा कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी कोर्टाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीला कोर्टाने १२ आठवड्यांचा वेळ दिला आहे. अभ्यासासाठी दोन चार दिवस लागत नाही. त्यासाठी वेळ लागतो. विलनीकरणाचे दूरगामी परिणाम काय होतील? आर्थिक बोझा किती पडेल? याचा अभ्यास करावा लागणार आहे. सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचा निर्णय घ्यावा लागतो. हायकोर्टाने विचार करून कालावधी दिला आहे. आम्ही दिला नाही. तोच एक पर्याय आहे. त्या मार्गाचाच अवलंब करावा लागेल. हा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परब यांनी स्पष्ट केलं. या समितीसमोर जावून कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी म्हणणं मांडावं. जो अहवाल येईल तो आम्हाला मान्य असेल. तुम्ही कामावर जा. कामावर गेले तर नुकसान होणार नाही. पण कामावर न गेल्यास नुकसान होईल. राजकीय लोकं आपल्या पोळ्या भाजून घेतील. तुमचं नुकसान कुणी भरून देणार नाही. नंतर ते तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतील, असंही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन करत आहे. आवाहनाला प्रतिसाद देत बऱ्याच कर्मचाऱ्यांनी काम करण्याची तयारी दाखवली आहे. जे कर्मचारी कामावर येत असतील त्यांना संरक्षण देऊ. जे अडवत असतील त्यांच्यावर कारवाई करू. एसटीचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची चर्चेची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे संपकऱ्यांना भडकवत आहेत. कामगारांची जबाबदारी कोणी घेत नाही. कामगारांचे नुकसान झाले तर सदाभाऊ खोत किंवा गोपीचंद पडळकर त्यांची जबाबदारी घेणार नाहीत. ते हळूहळू संपापासून दूर जातील. कामगारांनी विचार करावा. सहकार्य करावं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ पुन्हा तोट्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले.

Leave a Reply