हायड्रोजन सोडाच, आता यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल – मालिकांच्या आरोपांवर आशिष शेलारांचे उत्तर

मुंबई : १० नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना भाजप नेते, आमदार आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मलिक यांचे सर्व आरोप शेलार यांनी फेटाळून लावले आहेत. रियाज भाटी याचा पंतप्रधान कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत भाटीचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासोबतही फोटो असल्याचे आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
आपण बुधवारी हायड्रोजन बॉम्ब टाकणार असे सांगत मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले. त्याला उत्तर देताना शेलार म्हणाले की, हायड्रोजन सोडाच, आता यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. मलिक यांनी अकबर-बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या बिर्याणीशी संबंध जोडला. पण त्यात काही तथ्य नाही. कितीही खोदकाम केले तरी आरोप करायला सुद्धा तुम्हाला काहीही सापडू शकलेले नाही.
मुन्ना यादव यांच्यावर केवळ राजकीय केसेस आहेत. त्यांच्यावर कोणतेही गुन्हेगारी प्रकरण नाही, असे शेलार म्हणाले. हैदर आझमबाबत मलिकांनी केलेल्या आरोपाचे ते स्वत:च उत्तर देणार असल्याचे शेलार म्हणाले. हाजी अराफात शेख हे सुद्धा उत्तर देणार आहेत. पण दोन वर्ष तुमचे सरकार आहे. तुमच्या पक्षाकडे गृहमंत्रीपद आहे, मग तुम्ही कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी विचारला.
हैदर आझम, हाजी अफारात शेख यांच्यावर कोणता गुन्हा तर सोडा, दोन वर्षांपासून साधा एनसी (अदखलपात्र गुन्हा) सुद्धा दाखल नसल्याचे शेलार म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतना त्यांच्या काळात कुठलाही गैरव्यवहार काळात झालेला नसल्याचे ते म्हणाले. आता ज्या हाजी अराफात शेखच्या भावाबद्दल हे बोलताहेत, तो आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, असे शेलार म्हणाले.

Leave a Reply