बस व टँकरच्या अपघातात १२ प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू

जयपूर : १० नोव्हेंबर – राजस्थानमधील बाडेमर-जोधपूर महामार्गावर एक भयानक दुर्घटना घडली आहे. एका खासगी प्रवासी बसला टँकरने धडक दिल्याने भीषण अपघात घडला. ज्यामध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार १२ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
या भीषण अपघातानंतर बाडमेर-जोधपूर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, बस बालोत्रा येथून सकाळी ९.५५ वाजता निघाली आणि चुकीच्या बाजूने येणाऱ्या टँकरने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला.
टँकरची बसला धडक झाल्यानंतर बसला आग लागली. या बसमध्ये २५ प्रवासी होते, प्रशासनाला दहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मोठ्यासंख्येने पोलीस दल देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
या भीषण अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. ”राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर बस आणि टँकरच्या धडकेने लोकांना आपला जीव गमवावा लागला हे दुःखद आहे. या दु:खाच्या प्रसंगी, मी शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. तसेच, अपघातामधील जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

Leave a Reply