नागपूर : ८ नोव्हेंबर – कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वर्धा मार्गावरील सीआयसीआर क्वॉर्टर येथे सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
टिकाराम गोकुल अरखेल (वय ५४) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिकाराम हे केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्रात चतुर्थश्रेणी कर्मचारी होते. त्यांचा पत्नीसोबत वाद व्हायचा. काही दिवसांपूर्वी एका नातेवाईक महिलेसोबतही त्यांचा वाद झाला. तिने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांत तक्रार दिल्याने टिकाराम तणावात राहायला लागले. सकाळी पत्नीसमोरच त्यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीने टिकाराम यांच्या गळ्याभोवतीचा फास काढला. टिकाराम यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.