दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये २४ तासात १४ जणांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू

पाटणा : ४ नोव्हेंबर – दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये गेल्या २४ तासांत १४ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. गोपालगंज जिल्ह्यात सहा आणि बेतिया जिल्ह्यात सुमारे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरजेडी नेते मनोज झा यांनी विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. हेच राज्यातील कटू सत्य असल्याचं झा यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी गोपालगंज जिल्ह्यातील महमदपूर पोलीस ठाण्याच्या आसपासच्या गावातील लोकांनी दारू प्यायली. यानंतरच अनेकांची तब्येत बिघडू लागली, त्यानंतर त्या लोकांना मोतिहारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्याचवेळी बेतिया येथे देशी बनावटीची विषारी दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मद्यप्राशन केल्यानंतर अनेकांची प्रकृती खालावल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच ८ जणांचा मृत्यू झाला.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी बनावट दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. मनोज झा यांनी ट्विट करून लिहिले की, “मुख्यमंत्री जी, हे तुमच्या दारुबंदीचे क्रूर सत्य आहे….पण तुम्ही काळजी करू नका आणि चिंतनही करू नका…काहीही करून निवडणूक जिंकून घ्या… बाकीचं जनतेला भोगू… कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्या…तुम्हाला काय?”
दरम्यान, बेतिया प्रशासनाने या प्रकरणी वैद्यकीय पथक तपासासाठी पाठवले आहे. तर पोलीसही मृतांच्या पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहेत.

Leave a Reply