सर्वांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून काम केले पाहिजे – सोनिया गांधी

नवी दिल्ली : २५ ऑक्टोबर – आपल्याला लोकशाही, राज्यघटना आणि यासोबत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचे रक्षण करायचे आहे. तसेच, सध्या भाजपकडून होणारा खोटा प्रचार ओळखण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केले आहे. आज काँग्रेसच्या मुख्यालयात पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांसह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
आपण भाजप, आरएसएसच्या वैचारिक मोहिमेशी वैचारिक मुकाबला केला पाहिजे. आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर यासाठी आपण दृढ निश्चयाने लोकांसमोर केले पाहिजे. भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार आपण उघड केला पाहिजे. असही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, मी शिस्त आणि एकतेला सर्वोच्च प्राधान्य देऊ इच्छीते. काँग्रेसमधील आपल्यापैकी प्रत्येकासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघटना मजबूत करणे. सर्वांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून काम केले पाहिजे अशी अपेक्षाही सोनिया गांधींनी यावेळी व्यक्त केली आहे.
यापूर्वी, काँग्रेस कार्यकारिणीची (२६ ऑक्टोबर)रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये पुढील वर्षी संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील. तसेच, १ नोव्हेंबरपासून सदस्यता मोहीम सुरू होईल असेही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, पक्षाची संघटनात्मक निवडणूक ६ सप्टेंबर २०२२ रोजी होऊ शकते आणि ऑक्टोबरपर्यंत पक्षाचा नवा अध्यक्ष ठरेल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
भारतीय युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि पक्षाच्या सोशल मीडिया विभागासारख्या आघाडीच्या संघटनांनी राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. दरम्यान, राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, चरणजित सिंग चन्नी आणि भूपेश बघेल यांनीही राहुल गांधींना पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती. यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहूल गांधी यांनी पक्षाचे अध्यपद स्वीकारण्याबाबत आश्वासन दिले आहे अशी माहिती दिली आहे.

Leave a Reply