शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा सरकारचा निर्णय – विजय वडेट्टीवार

नागपूर : २५ ऑक्टोबर – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा निर्णय आहे, अशी माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या संदर्भात प्रयत्न केले आहेत. वित्त आयोगाकडून आज आमच्या मदत व पुनर्वसन खात्याकडे निधी वर्ग केला जाईल. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. कोणत्याही परिस्थिती हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात गेला पाहिजे. हा निधी रब्बी हंगामाच्या उपयोगी पडावा, खरिप तर गेला आहे. रब्बी हंगामाच्या कामासाठी हा निधी वापरला जावा, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
५५ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती सर्वेक्षणातून आली आहे. सर्वाधिक ७० टक्के नुकसान मराठवाड्यात झालेलं आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं आणि सर्वाधिक गरज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३७०० कोटी रुपयांचा निधी वाटला जाईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
एनडीआरएफच्या निकषाप्रमाणं केंद्र सरकारकडून अद्याप निधी आलेला नाही. मात्र, तो निधी येईल, अशी अपेक्षा असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
अकोला, अमरावती आणि वाशिम भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी दिला जाईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Leave a Reply