लहान मुलांच्या भांडणावरून दोन लहान भावांनी मोठ्या भावाला डिझेल टाकून केला जाळण्याचा प्रयत्न

चंद्रपूर : २५ ऑक्टोबर – चंद्रपुर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात दोन लहान भावांनी आपल्या ४६ वर्षीय मोठ्या भावावर डिझेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांच्या भांडणामागील कारण होतं ते त्यांच्या लहान मुलांमध्ये झालेलं भांडण. या प्रकरणातील पीडित मोठ्या भावाचं नाव जयदेव मुनेश्वर असं आहेत. ते रविवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी शेतात गेले होते. या दरम्यान त्यांच्या दोन लहान भावांना त्यांच्या मुलांमध्ये झालेला वाद कानी पडला. त्याच मुद्द्यावरुन त्यांनी आपल्या भावावर हल्ला केला.
पीडित जयदेव जेव्हा शेतातून घरी आले तेव्हा आरोपी भावांनी मोठा कालवाकालव केला. घरात मोठा गोंधळ उडाला. यावेळी दोन्ही भावांनी मोठ्या भावावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. घरातला गोंधळ ऐकूण आजूबाजूचे काही नागरिक घरात जमले होते. त्या प्रत्यक्षदर्शींनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्यक्षदर्शींना देखील भाजल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शींना अडविल्यामुळे जयदेव यांचा प्राण वाचला.
प्रत्यक्षरदर्शींनी तातडीने जयदेव यांना चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल केलं. तिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन भाऊ आपल्या मोठ्या भावाशी असं वागूच कसं शकतात? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल पोलिसांनी देखील घेतली आहे. पोलिसांनी आरोपी भाऊ रवी आणि अमृत यांना बेड्या ठोकल्या आहेत.
संबंधित घटनेने भावा-भावाच्या नात्याला काळीमा फासली आहे. खरंतर या जगात आपल्याला आपले आई-वडील, मित्रमंडळी आणि भावंडांशिवाय कोणीच गरजेच्या वेळी मदत करु शकत नाही. संकट काळात हीच माणसं आपल्या जवळ असतात. ती आपल्याला संकटातून बाहेर पडण्यास मदत करतात. याशिवाय एकत्र गुण्यागोविंदाने राहिल्याने समाजात आपल्याकडे नागरिकांचा बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असतो. एकीत बळ असते, असं म्हणतात. त्यामुळे अशा घटनांमधून नुकसानाशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे प्रेमाने गुण्यागोविंदाने राहिल्याने आपले माणसं जपली जातात आणि त्या नात्यातून आपल्याला समाधान देखील मिळतं.

Leave a Reply