हिमाचल प्रदेशमध्ये १७ गिर्यारोहक बेपत्ता, शोधमोहीम सुरु

नवी दिल्ली : २१ ऑक्टोबर – हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात सतरा गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर किन्नौर जिल्ह्यातील चितकुलला निघालेल्या गिर्यारोहकांच्या शोधासाठी यंत्रणा सक्रिय झाले आहे. किन्नौर प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर आयटीबीपीची टीम पहाटे साडेचारच्या सुमारास शोध मोहिमेसाठी रवाना झाली आहे. त्याचबरोबर लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे.
हे गिर्यारोहक १४ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशीला लागूनच असलेल्या किन्नौरमधील चितकुलसाठी निघाले होते. पण १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान लमखागा खिंडीत खराब हवामानादरम्यान ते बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. लामखागा पास हा किन्नौर जिल्ह्याला उत्तराखंडमधील हर्षीलशी जोडणारा सर्वात कठीण मार्ग आहे. किन्नौरचे उपायुक्त आबिद हुसेन सादिक यांनी सांगितले की, पोलीस आणि वनविभागाची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किन्नौर स्वाती डोगरा यांनी सांगितले की, आयटीबीपीशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. ट्रेकर लामखागा खिंडीच्या जवळ असल्याची माहिती आहे. आयटीबीपीची टीम आज सकाळी त्यांच्या शोधासाठी बाहेर गेली. हे गिर्यारोहक उत्तराखंडमधील हर्षिल येथून हिमाचलच्या चितकुल गिर्यारोहणाच्या मार्गावर लामखागा खिंडीतून निघाले होते. १७ गिर्यारोहकांची टीम मंगळवारी चितकुलला पोहोचणार होती, पण ते पोहोचू शकले नाहीत. तसेच त्यांची कोणताही माहिती मिळू शकला नाही. आता आयटीबीपीच्या बचाव पथकाच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जाईल.

Leave a Reply