निर्माणाधीन पूल कोळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर राडा

नागपूर : २० ऑक्टोबर – पूर्व नागपूर शहरातील भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी भागाला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचा काही मंगळवारी रात्री कोसळला. या अपघातानंतर उपराजधानी नागपुरमध्ये राजकारण पेटले आहे. हा पूल म्हणजे भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर जोरदार राडा घातला.
राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी एनएचएआयचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांच्यासह केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी एनएचएआयच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीदेखील झाली.
नागपूर-भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी या परिसरात गेल्या सात वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळून अपघात झाला होता. सुदैवाने या घटनेच्या वेळी त्या भागात काम बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चौकशी समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय व्हिएनआय इन्स्टिट्यूटलादेखील अपघाताचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी पत्र एनएचएआयकडून देण्यात आले आहे.
कळमना भागातील पिलर क्रमांक पी-7 आणि पी- 8 च्यावर साडेतीन वर्षांपूर्वी गर्डर टाकण्यात आले होते. मंगळवारी रात्री अचानक ते गर्डर खाली कोसळून अपघात झाला आहे. प्राथमिक तपासानंतर हा अपघात लोड बेरिंग फेल झाल्याने अपघात झाल्याची शक्यता एनएचएआयचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
२०१४ साली या पुलाचे भूमिपूजन होऊन सात वर्षे उलटले तरी पुलाचे काम अर्थावट आहे. हा पूल भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण आहे. या करिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

Leave a Reply