छापे टाकून काटा काढत नाही तर, काटा काढून छापा टाकतो – रामदास आठवले

नागपूर : १७ ऑक्टोबर – ईडी, सीबीआयचा काटा काढण्यासाठी वापर केला जात असल्याचा इन्कार करून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘छापे टाकून काटा काढत नाही तर, काटा काढून छापा टाकतो’, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला.
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त आठवले यांनी दीक्षाभूमीचे दर्शन घेतले. नागपुरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. शनिवारी दुपारी पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी अनेक विषयांवर मत व्यक्त केले. ईडी, सीबीआयचा मुद्दाम वापर केला जात असल्याचा इन्कार करून आठवले म्हणाले, ‘सर्व तपासयंत्रणा स्वतंत्र आहेत. त्यांच्याकडील माहितीच्या आधारे तपास चालला आहे.’
राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत रोज भांडणे चालली आहेत. कुरघोडीच्या राजकारणात विकासाकडे पार दुर्लक्ष झाले. राज्यभरात सर्वत्र असलेले खड्डे बुजवले नाही तर, खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही आठवलेंनी लगावला. शरद पवार प्रदीर्घ काळापासून महाराष्ट्र व दिल्लीत राजकारण करत आहेत. त्यांना लक्ष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही आठवले एका प्रश्नावर म्हणाले. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करू, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, ‘आम्ही बंगालचा महाराष्ट्र करू’, असे उत्तर देत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.
मुंबई महापालिकेत १९९२ साली काँग्रेससोबत आघाडी केली होती. यावेळी भाजपसोबत राहू, असे सांगून आठवले म्हणाले, ‘दलित पँथरला पुढच्यावर्षी ५० वर्षे होत आहेत. चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी पँथरची नव्याने रचना करण्यात येणार आहे.’
सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीत भरघोस वाढ झाली आहे. विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीधारकांची संख्या वाढवणे व टक्केवारीबाबत फेरविचार करण्यात येणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, पूरण मेश्राम, प्रवक्ते राजन वाघमारे, शहराध्यक्ष बाळू घरडे आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याची आता इच्छा राहिलेली नाही. याकडे लक्ष देता, पक्षाचा विस्तार करण्यावर भर राहील. पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. येत्या २७ ऑक्टोबरला ब्राह्मण संमेलन व १८ डिसेंबरला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि इतर पक्षांना न मिळणारी मते लक्षात घेऊन भाजपसोबत युतीसाठी चर्चा चालली आहे. दहा-बारा जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. भाजपने प्रतिसाद दिला नाही तर स्वबळावर लढण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

Leave a Reply