बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख – संजय राऊत

मुंबई : ११ ऑक्टोबर – उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले आहेत. मात्र भाजपाने या बंदलाविरोध केला असून सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असं म्हटलं आहे. मात्र बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख आहेत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
“शेतकऱ्यांचा रोष आणि संताप समजून घेण्याची गरज आहे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर,” असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. “लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
लखीमपूर, हरयाणा, गाझीपूर ज्याप्रकारे शेतकऱ्यांना चिरडण्यात आलंय त्या प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र बंद आहे. अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्राचा आवाज म्हणजे हा बंद, असं म्हणत राऊत यांनी या बंदचं समर्थन केलं आहे. तसेच हा राजकीय बंद नसून शेतकऱ्यांसाठी केलेला बंद आहे असंही राऊत म्हणालेत. तसेच भाजपाला थेट आव्हान देताना, बंद मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी करुन दाखवावा असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
“आज मध्यरात्रीपासून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात झाली आहे. देशभरात नवरात्री जागवल्या जात आहेत. कोरोना काळात धार्मिक उत्सव, सण साजरे करण्यावर कठोर निर्बंध सुरू आहेत, पण शेतकऱ्यांवरील अन्यायावर कोणतेच निर्बंध दिसत नाहीत. बेबंद, बेफामपणे शेतकऱ्यांना चिरडणे-भरडणे आणि ठार मारणे सुरूच आहे. हा जुलूम आहे, दडपशाही आहे. लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे,” असं आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply