आज वसुली चालू आहे का बंद? – अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल

मुंबई : ११ ऑक्टोबर – उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकरी आंदोलकांना चिरडून ठार मारल्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. एकीकडे बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे भाजपचे नेते महाविकास आघाडीवर टीका करत आहे. या वादात आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. आज वसुली चालू आहे का बंद? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला आहे.
अमृता फडणवीस या नेहमी या ना त्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. आज महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी पुकारलेल्या बंदवर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून खोचक टीका केली आहे.
‘आज वसूली चालू आहे का बंद? असा सवाल करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसंच, महाराष्ट्र बंद नही है, असा हॅशटॅगही अमृता फडणवीस यांनी वापरला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘महाविकास आघाडी प्रायोजित बंदचा चेहरा उघडा पडला आहे. कारण लखीमपूर प्रकरणात बंद करतात. पण राज्यातल्या शेतकऱ्यांना एका पैशांची मदत केली नाही. कर्जमाफी, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या आहे. त्यांच्या घटक पक्षांना म्हणाले की, भाजप सरकार बरे होते. आघाडी सरकारच्या काळात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला, त्यांना बंद करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
प्रशासनाची मदत घेवून लोकांना बंद करायला भाग पाडले जात आहे. या सरकारचे नावचं बंद सरकार आहे. यांनी सर्व योजना बंद केल्या आहे. दमदाटी करुन बंद केला जाच आहे. हा सरकार प्रायोजित दहशतवाद आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

Leave a Reply