हत्या प्रकरणातील आरोपीला वेगळी वागणूक का दिली जात आहे? – सर्वोच्च न्यायालयाने युपी सरकारला फटकारले

नवी दिल्ली : ८ ऑक्टोबर – लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात हरीश साळवे यूपी सरकारच्या वतीने हजर झाले. या सुनावणीत सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी युपी सरकारला फटकारले आहे. या दरम्यान, सरन्यायाधीशांनी हत्या प्रकरणातील आरोपीला वेगळी वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न यूपी सरकारवर उपस्थित केला. तर, नोटीस बजावल्याबद्दल हरीश साळवे यांनी न्यायालयात विचारले असता “आम्ही नोटीस जारी केली नव्हती. आम्ही स्टेटस रिपोर्ट मागितला होता,” असं न्यायालयाने सांगितलं. तसेच योगी सरकारने स्टेटस रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे, अशी माहिती साळवे यांनी कोर्टात दिली.
सुनावणीदरम्यान, सीजेआय म्हणाले की मुख्य आरोपीविरोधात अतिशय गंभीर गुन्हा दाखल असून ते न्यायालयात हजर झालेले नाही. यावर साळवे म्हणाले की, “आम्ही त्यांना पुन्हा नोटीस बजावली असून उद्या सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. जर मिश्रा हजर राहिले नाही, तर कायदा त्याचं काम करेल. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृतांना गोळी लागलेली नाही, त्यामुळे आरोपींना नोटीस बजावण्यात आली,” असे त्यांनी सांगितले. यावेळी “लखीमपूर हिंसाचार प्रकरणी यूपी सरकारच्या तपासावर आम्ही समाधानी नाही. राज्य सरकारने कठोर पावले उचलावी,” असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने तपास दुसऱ्या यंत्रणेकडे सोपवण्याचे संकेत दिले आणि विचारले की इतर कोणती यंत्रणा तपास करू शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी दसऱ्याच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे.
लखीमपूर खेरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply