दीड वर्षानंतर नागपूर शहरातील २२५ शाळांची वाजली पहिली घंटा

नागपूर : ४ ऑक्टोबर – कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून (मार्च २०२०) बंद असलेल्या शाळा कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर अखेर आजपासून (सोमवारी) सुरू झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार ८ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा सुरू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आज (सोमवारी) नागपूर शहरातील २२५ शाळांची पहिली घंटा वाजली आहे. गेल्या दीड वर्षात विद्यार्थ्यांची शाळा केवळ मोबाइलवरच भरवली जाते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वैताग आला होता. मात्र आज प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्याने शिक्षकांसोबतच विद्यार्थी वर्ग सुखावला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा केव्हा सुरू होईल? हा प्रश्न प्रत्येक पालकांसह विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला होता. मोबाइलवर शिक्षणाचे धडे गिरवताना शिक्षक आणि विद्यार्थी पुरते वैतागले होते. मात्र आता स्वप्नपूर्ती व्हावी त्याप्रमाणे शाळा सुरू झाले आहेत. मित्र-मैत्रिणीसोबत पुन्हा धमाल करायला मिळेल, याचा प्रचंड आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मात्र कोविड नियमांचे तंतोतंत पालन विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि सर्वांनाच करावे लागणार आहे.
शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. त्यानुसार शाळेतील पाण्याच्या टाक्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे. विद्यार्थ्यांना घरूनच आपली पाण्याची बाटली सोबत आणायची आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपला टिफेन आणि पाणी इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करता येणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होणार नाही, याची दक्षता शाळा व्यवस्थापनना तर्फे घेण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या आदेशाने जुलै महिन्यातच ग्रामीण भागातील ८ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोना संदर्भात एकही अप्रिय घटना घडली नाही. त्यामुळे आता नागपूरच्या ग्रामीण भागातील ५ ते ८ वर्गाच्या शाळा भरणार आहेत. त्यानुसार आता ५ ते १२ वर्गाच्या ४०१ शाळा सुरू झाले आहेत.

Leave a Reply