भाजपवाल्यांना ज्योतिष बदलण्याची गरज – बाळासाहेब थोरात

पुणे : २ ऑक्टोबर – महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांना काहींनाकाही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो. तो आता त्यांना बदलण्याची गरज आहे, असा खोचक टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे स्टेशन येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टी झाली ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी मराठवाडा येथे झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेले आहे. तेथील परिस्थितीवर आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्याला मदत करणे हे महत्त्वाच आहे. त्याला कोणते दुष्काळ म्हणणे हे महत्त्वाचे नाही. शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे महाविकस आघाडी सरकार ही उभी आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
पंजाबमधील राजकीय नाट्यावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहे. अनके कठीण दिवस हे काँग्रेसने पाहिले आहे. जर आपण इतिहास बघितला तर काँग्रेस हा विचार आहे. तो सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजलेला आहे. या घडामोडीनंतरदेखील काँग्रेस पुन्हा उभी राहिलेली आपल्याला पहिला मिळेल, असेही ते म्हणाले.

Leave a Reply