आकडेवारी निश्चित झाल्यावरच मदतीचा निर्णय – बाळासाहेब थोरात

पुणे : १ ऑक्टोबर – गुलाब चक्रीवादळाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. शुक्रवारीपर्यंत पाऊस सुरू होता. आकडेवारी निश्चित झाल्यावरच निर्णय घेतला जाणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की दोन वर्षे हे नैसर्गिक संकटाचे गेले आहे. दोन चक्रीवादळ, महापूर त्यानंतर गतवर्षी अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर करावी लागली. या वर्षी अतिवृष्टीचा कोकणात पहिला फटका बसला. त्यांनतर गुलाब चक्रीवादळाचा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठकदेखील झालेली आहे. एकंदरीत नुकसानीचे स्वरुप आणि त्याची आकडेवारी पाहता ते एकत्र करणे आवश्यक असते. तशा पद्धतीची काळजी घेतली जात आहे. तसेच असे कोणी सांगत असेल की शेतात जा आणि तेथून फोटो पाठवा तर त्याच्यावर कारवाई करू, अशा इशाराही महसूल मंत्र्यांनी दिला आहे.
शेवटी प्रभाग रचनेत मत-मतांतरे होती. प्रत्येकाच वेगळे म्हणणे होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एकमताने घेतला आहे. कोणीही पक्षाचा विचार करता निर्णय घेतलेला नाही. जेवढा प्रभाग रचनेचा फायदा सत्ताधाऱ्यांना होतो, तेवढा विरोधकांनाही होतो. चारचा प्रभाग असावा की दोनचा असावा, अशी चर्चा होते. असे असताना तीनचा प्रभाग निश्चित करण्यात आला आहे. प्रभाग रचनेत पक्षीय स्वरुप नसून एकमताने घेतलेला निर्णय आहे. तसेच आम्ही एकत्र सत्तेत आहोत. चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जितके शक्य होईल, तितके आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेदेखील यावेळी थोरात म्हणाले.

Leave a Reply