सर्व भ्रष्ट नेत्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी – किरीट सोमय्या

मुंबई : ३० सप्टेंबर – भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या हे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर एकामागून एक आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख परिवहन मंत्री अनिल परब खासदार भावना गवळी यांच्यावर चौकशीच्या फेऱ्यातदेखील सुरू झाल्या आहेत. या सर्व नेत्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमैय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्यपालांना महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या आरोपांबाबतची माहिती दिल्याचे किरीट सोमैय्या यांनी सांगितले. राज्याचे पोलीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली काम करत आहेत. आपल्याला कोल्हापूरला जाण्यापासून पोलिसांनी बेकायदेशीररित्या रोखल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर केला आहे.
आघाडी सरकारच्या नेत्यांवर केलेल्या आरोपानंतर अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांनी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. हे दावे न्यायालयात टिकणार नाहीत. उलट महाविकास आघाडी सरकारला त्यांच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची भूमिका न्यायालयामध्ये स्पष्ट करावी लागेल, असे मत सोमैय्या यांनी व्यक्त केले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकापूर्वीदेखील सोमैय्या यांनी अशा प्रकारचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर केले होते. मात्र, आरोप केलेल्या नेत्यांपैकी आता बरेच नेते भाजपच्या गोटामध्ये दिसत आहेत. मात्र, आपण केवळ आरोप करत नाहीत. आपल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. त्यामुळे आरोपानंतर आघाडी सरकारचे नेते आणि आजारी पडतात किंवा फरार होत असल्याची मिश्किल टीका किरीट सोमैय्या यांनी आघाडीच्या मंत्र्यांवर केली आहे.

Leave a Reply